गंगामाई मध्ये 'आनंददायी शनिवार' उपक्रमाची सुरुवात, प्रतिक साठे यांचे 'शरीर, मन, मेंदू' या विषयावर चित्तवेधक सादरीकरण
आठवडाभर अभ्यास करून विद्यार्थी शारीरिक, मानसिकरित्या थकून जातात. अशा विद्यार्थ्यांना आठवड्याचे शेवटी, म्हणजे शनिवारी काही काळ अभ्यासापासून बाजूला नेऊन एका छानशा उपक्रमातून त्यांचे मनोरंजन करणे गरजेचे असते. मनोरंजन करतानाच त्यांच्यामध्ये काही मूल्येही रुजविता येतात. त्यासाठी प्रत्येक शाळेने 'आनंददायी शनिवार' हा उपक्रम राबवावा ही संकल्पना माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.श्री.एकनाथ आंबोकर यांनी मांडलेली आहे. त्यांच्या संकल्पनेला पहिल्यांदा प्रत्यक्षात आणण्याचे कार्य श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे करण्यात आले. इचलकरंजीतील प्रतिरंग प्रॉडक्शनचे प्रतीक साठे यांनी तब्बल एक तास 'शरीर, मन, मेंदू' या विषयावर एक उद्बोधन सत्र प्रस्तुत केले. प्रारंभी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.एस.गोंदकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्या म्हणाल्या, "श्रीमंत गंगामाई प्रशाला अभ्यासक्रमपूरक सहशालेय उपक्रम राबविण्यामध्ये नेहमीच आघाडीवर असते. शिक्षणाधिकारी साहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 'आनंददायी शनिवार' उपक्रम राबविणारी आमची पहिलीच शाळा असावी. विद्यार्थिनींनी या उपक्रमातून आनंद लुटावा." मुख्याध्यापिका यांनी प्रतीक साठे यांचा परिचय करून दिला. प्रतीक साठे हे बहुआयामी कलाकार असून डॉक्युमेंटरी, अभिनय, जाहिरात, माध्यमे या क्षेत्रातील एक जाणकार व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या प्रतिरंग प्रॉडक्शन या संस्थेच्या माध्यमातून डॉक्युमेंटरीज, जाहिराती बनविण्याबरोबर विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासाठी विविध उद्बोधन सत्रे आयोजित करून सर्वांना एक चांगला संदेश देण्यासाठी ते प्रयत्न करीत असतात. श्रीमंत गंगामाईमध्ये 'शरीर, मन, मेंदू' या विषयावर आपल्या सत्रात त्यांनी छोटी छोटी परंतु शाश्वत असणारी जीवनमूल्ये विद्यार्थिनींना सहजसोप्या भाषेत सांगितली. ही मूल्ये प्रभावीपणे अमलात कशी आणावीत हे आपल्या अनोख्या वक्तृत्व शैलीद्वारे विद्यार्थिनींच्या मनावर बिंबविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वेगवेगळी उदाहरणे, कथा सांगून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा मंत्र विद्यार्थिनींना दिला. आईवडील, शिक्षक यांचा मान राखणे, कधीही खोटे न बोलणे, सोशल मीडिया फारसा न वापरणे, नियमित व्यायाम करणे अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी पटवून दिल्या. ध्यानधारणेच्या माध्यमातून मानसिक व आत्मिक विकास कसा साधायचा, याचे प्रात्यक्षिक त्यांनी करून घेतले. त्यांच्या कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मधेमधे हसवत, विनोद सांगत, प्रश्न विचारत पुढे जात असल्याने विद्यार्थिनी न कंटाळता त्यांच्या म्हणण्याला प्रतिसाद देत होत्या. अशाप्रकारे हा उपक्रम यशस्वी पद्धतीने पार पडला.याप्रसंगी उपमुख्याध्यापिका सौ. एस.एस.भस्मे, पर्यवेक्षक श्री व्ही.एन.कांबळे, पर्यवेक्षक श्री एस.व्ही.पाटील, क्रीडाविभाग प्रमुख प्रा. श्री शेखर शहा, शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.