विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या कार्यक्रमावर संशय ; डिजिटल मीडियाचा बहिष्कार
इचलकरंजीतील विद्यार्थ्याच्या संशयास्पद आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर गावभाग पोलीस ठाण्याच्या “करिअर मार्गदर्शन शाळा” उपक्रमावर संशयाचा फास आवळला आहे. संबंधित घटनेत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी घातपाताचा ठोस संशय व्यक्त केला असूनही, आठवडाभर पोलीस प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती माध्यमांना दिलेली नाही. या प्रकारामुळे पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य शासनाकडून डिजिटल मीडियाला मान्यता असूनही, पोलीस ठाण्यांकडून आजही डिजिटल पत्रकारांकडे दुजाभाव केला जातो, हे या प्रकरणातून अधोरेखित झाले. विशेष म्हणजे, यश यादव या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी पारंपरिक माध्यमे गप्प असताना, डिजिटल मीडियाने सातत्याने आवाज उठवत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांकडून संबंधित शैक्षणिक संस्थेला पाठीशी घालण्याचे प्रकार उघडकीस आल्याचा आरोप आहे. हीच घटना घडलेल्या गावभाग पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन उपक्रम राबवला जात आहे. मात्र, यामुळे अधिकच उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असून, नागरिकांतून या कार्यक्रमाचा उद्देशच प्रकरण दडपण्याचा असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे यांनी या विषयावर प्रतिक्रिया देताना सांगितले, या कार्यक्रमामध्ये विशिष्ट शैक्षणिक संस्थांचा हस्तक्षेप स्पष्ट दिसून येतो. त्यामुळे संवादाच्या नावाखाली सत्य दडपले जाऊ नये म्हणून ‘डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना’ने कार्यक्रमाच्या बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर माध्यम स्वातंत्र्य, पोलिसांची पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या हिताची व्यापक चर्चा पुन्हा एकदा उफाळून आली आहे. यापुढील काळात अशा घटनांकडे अधिक सजगतेने आणि उत्तरदायित्वाने पाहण्याची गरज असल्याचे मत डिजिटल माध्यमांनी व्यक्त केले आहे.