लाखेनगर परिसरात असलेल्या सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया सीइटीपी प्रकल्पातून सोडले जात असलेले सांडपाणी व स्लज यांच्या दुर्गंधीमुळे भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने या संदर्भात योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी माणुसकी फौंडेशनच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला, यावेळी प्रवेशद्वारात जोरदार निदर्शने करत दुर्गंधी बंद न झाल्यास प्रकल्पाचे काम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला. सीईटीपीच्या कामाच्या संदर्भात वारंवार तक्रार करुनही काहीच कार्यवाही होत नसल्याने शुक्रवारी माणुसकी फौंडेशनचे रवि जावळे यांच्या नेतृत्वाखाली भागातील नागरिकांनी महानगरपालिकेवर मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली. यावेळी शिष्टमंडळाने उपायुक्त तैमूर मुल्लाणी यांची भेट घेत निवेदन देत परिस्थितीची माहिती दिली. यावेळी रहिम जमादार, अशोक लाखे, दिपक लाखे, अंकुश लाखे, विशाल लाखे, सागर जावळे, रवि पाटोळे, सुदर्शन कांबळे, राहुल जाधव, अक्षय जावळे आदिसह नागरिक उपस्थित होते.