इचलकरंजी येथील वार्ड क्र.८ मधील व प्रभाग क्र.१५ मध्ये शांतीनगर परिसरात महानगरपालिकेच्या वतीने "प्राथमिक आरोग्य केंद्र" सुरू करण्यासाठी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी तत्वत: मंजूरी दिली असल्याची माहिती मा. उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी दिली. याबाबत ते म्हणाले प्रभाग क्र.१५ मध्ये कोल्हाटी समाज, चर्मकार समाज, कंजारभाट समाज, शांतीनगर, झोपडपट्टी पुनर्वसन झालेला जाधव मळा, संजय गांधी व राजीव गांधी झोपडपट्टी असा २५ हजार लोक वस्तीचा भाग आहे. कोव्हीड काळात वेळेवर औषधोपचार मिळाला नसल्याने किमान १५ पेक्षा जादा लोकांचा मृत्यू झाला आहे. त्या भागात झोपडपट्टी, कत्तलखाना, काळा ओढा असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे, कोणताही आजार किंवा साथ पहिल्यांदा या भागात येते, या परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, त्यामुळे शासनाने इचलकरंजी शहरासाठी मंजूर केलेल्या 10 केंद्रापैकी 1 केंद्र शांतीनगर भागात तात्काळ सुरू करावे, अशी मागणी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे कोल्हाटी, कंजारभाट समाजासह भागातील सर्व नागरीकांच्या वतीने एका निवेदनादनाद्वारे केली.शिवाय या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली, असे स्पष्ट करून रवी रजपूते म्हणाले, की हे "प्राथमिक आरोग्य केंद्र" थोरात चौकातील महापालिकेच्या गाळ्यात किंवा कै,महादेव हरी लाखे समाज मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरील जागेत त्वरीत सुरू करावे, अशी यावेळी मागणी करण्यात आली, त्यावर आयुक्त दिवटे यांनी शांतीनगर भागात "प्राथमिक आरोग्य केंद्र" तत्काळ सुरू करण्यासाठी तत्वत: मंजूरी दिली आहे, असेही रजपूते यांनी सांगितले याचवेळी कोल्हाटी समाजाच्या दफनभूमी मधील १९ गुंठे बाकी जागा तत्काळ मिळण्यासाठी चर्चा करावयाची असल्याने वेळ मिळावा अशी मागणी आयुक्त दिवटे यांच्याकडे करण्यात आली, त्यावेळी या प्रश्नी आठवडयात कोल्हाटी समाज व संबंधीत अधिकारीयांची बैठक घेण्यात येणार असल्याचे आयुक्त दिवटे यांनी स्पष्ट केले. असेही रवी राजपूते यांनी सांगितले. यावेळी भागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
स्थानिक बातम्या