१५ ऑगस्टपासून फास्टॅग आधारित वार्षिक पास योजना सुरू ; खाजगी वाहनांसाठी दिलासादायक निर्णय – दुचाकींना टोलमुक्ती कायम

१५ ऑगस्टपासून फास्टॅग आधारित वार्षिक पास योजना सुरू ; खाजगी वाहनांसाठी दिलासादायक निर्णय – दुचाकींना टोलमुक्ती कायम

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील वाहनचालकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून, खाजगी वाहनांसाठी फास्टॅग आधारित वार्षिक पास योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. १५ ऑगस्ट २०२५ पासून ही योजना देशभर लागू होणार आहे. या योजनेअंतर्गत ३,००० रुपयांचा वार्षिक पास मिळणार असून, तो एक वर्ष किंवा २०० प्रवासांपर्यंत (जे आधी पूर्ण होईल ते) वैध राहणार आहे. हा पास विशेषत: कार, जीप, व्हॅन यांसारख्या गैरव्यावसायिक खाजगी वाहनांसाठी लागू असेल. यामुळे वारंवार राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. फास्टॅग प्रणालीमुळे टोल नाक्यावर थांबण्याची गरज राहणार नाही, त्यामुळे प्रवास अधिक सुलभ व वेळबचतीचा होणार आहे. दरम्यान, काही माध्यमांनी दुचाकी वाहनांवर टोल लावण्यात येणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, गडकरी यांनी यावर स्पष्टपणे नाराजी व्यक्त करत स्पष्टीकरण दिले आहे की, दुचाकी वाहनांवर कोणताही टोल आकारण्यात येणार नाही. सरकारचा असा कोणताही प्रस्ताव नाही आणि दुचाकी वाहनधारकांना टोलमुक्ती कायम राहणार आहे. या नव्या योजनेमुळे खाजगी वाहनचालकांना टोल खर्चात बचत होणार असून, राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना होणारा त्रासही कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post