इचलकरंजी महसूल मंडळाचा पीक विमा योजनेत समावेश; आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश

इचलकरंजी महसूल मंडळाचा पीक विमा योजनेत समावेश; आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश

गेल्या अनेक वर्षांपासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून वंचित राहिलेल्या इचलकरंजी महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून राज्य शासनाने इचलकरंजी महसूल मंडळाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महापूरासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना अधिक सुलभतेने मिळणार आहे. राज्याच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने यासंदर्भात अधिकृत अध्यादेश जारी केला आहे. याअंतर्गत मंडल स्तरावर पीक नुकसानीचा अंदाज घेऊन त्यानुसार भरपाई दिली जाणार आहे. यापूर्वी इचलकरंजी महसूल मंडळाचा योजनेत समावेश नसल्यामुळे, विमा भरूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागत होते. आता मात्र हा अन्याय दूर झाला असून अधिक शेतकऱ्यांना विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल शहर आणि परिसरातील शेतकऱ्यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला बाळासाहेब कलागते, पै. अमृत भोसले, बाबासो रुग्गे, सागर कम्मे, राजू चव्हाण, शिवाजी माळी, दादासो मगदूम, मौला मुजावर, जयपाल व महावीर बेडक्याळे, पिंटू कोळी, अरविंद निंबाळकर, चंद्रकांत बेडक्याळे, अजित चौगुले, महादेव मुडशिंगकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post