इचलकरंजीतील कृष्णानगर भागातील रस्ते, गटारी व शौचालयाची दयनीय अवस्था ; नागरिकांचा मनपावर संताप
इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 4, वार्ड-24 येथील कृष्णानगर भागातील रस्ते व गटारींची अवस्था अत्यंत दयनीय असून, गेल्या 20 वर्षांपासून या भागाकडे दुर्लक्ष झाले आहे. महाराष्ट्र गब्बी, गल्ली क्रमांक 4, महसोचा बोक, लायबलोमोरील भाग, कल्पवृक्ष भाग (एसटी मागार समोर) येथील रस्ते आणि गटारी खचलेले असून, नागरिकांना दररोज याचा त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील ऑक्सिजन पार्कमध्ये योग्य कंपाऊंड व संरक्षण नसल्यामुळे अनेक गैरप्रकार होत असून, संध्याकाळच्या वेळेस मद्यपान करणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. दारूच्या बाटल्या व काचा परिसरात विखुरलेल्या दिसत आहेत. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, परिसरातील सरकारी शौचालयाची अवस्था भयानक झाली असून, ते निकृष्ट स्थितीत आहे. गेली चार वर्षे नवे शौचालय बांधण्याची मागणी असूनही महानगरपालिकेकडून कोणतीच कारवाई झाली नाही. भाजपा माजी महिला शहराध्यक्षा सौ.पुनम जाधव व भागातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आशयाचे निवेदन आयुक्त व उपायुक्त यांना दिले असून, लवकरात लवकर समस्या सोडवण्याची मागणी केली आहे. अन्यथा, नागरिकांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.