लग्नास नकार दिल्याने तरुणीचा निर्घृण खून ; सरनोबतवाडीत संतापजनक घटना
कोल्हापूर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील अमृतनगर परिसरात मंगळवारी दुपारी एक संतापजनक घटना घडली. लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या तरुणाने आपल्या मैत्रिणीचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत तरुणीचे नाव सानिका उर्फ समीक्षा भरत नरसिंगे (वय २३, रा.कसबा बावडा) असे आहे. या प्रकरणी संशयित आरोपी सतीश यादव (रा. उंड्री, ता.पन्हाळा, सध्या रा.शिवाजी पेठ) याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश सध्या फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी तीन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी दिली. सानिका ही इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये कार्यरत होती. ती गेल्या सहा महिन्यांपासून सतीशसोबत सरनोबतवाडीत राहत होती. मात्र, सतत होणाऱ्या वादांमुळे ती व तिची मैत्रीण आयुषी अंपले पुन्हा आईच्या घरी परतल्या होत्या. दरम्यान, सतीश तिला वारंवार लग्नासाठी आग्रह करत होता आणि फ्लॅट रिकामा करण्याबाबत तगादा लावत होता. मंगळवारी समीक्षा व आयुषी फ्लॅटवर साहित्य आणण्यासाठी गेल्या असताना सतीश तिथे आला. पुन्हा एकदा लग्नाच्या मागणीवरून वाद झाला. या वादात सतीशने चाकूने सानिकाच्या छातीवर जोरात वार केला. जखमी सानिका रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि सतीश तिला लाथाबुक्यांनी मारहाण करून घटनास्थळावरून पसार झाला. आयुषीने सानिकाच्या नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर तिला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.