जलजीवन योजनेची कामे तातडीने पूर्ण करा – आमदार अशोकराव माने यांचा प्रशासनाला आदेश

जलजीवन योजनेची कामे तातडीने पूर्ण करा – आमदार अशोकराव माने यांचा प्रशासनाला आदेश

प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन जलजीवन योजनेची कामे तातडीने पूर्ण करावीत. निधीअभावी अडथळा येणार नाही, शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची जबाबदारी मी घेतो, अशी स्पष्ट ग्वाही आमदार डॉ. अशोकराव माने यांनी दिली आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनांची आढावा बैठक पंचायत समिती हातकणगले येथे आमदार माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस गटविकास अधिकारी श्रीमती शबाना मोकाशी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, संबंधित गावांचे सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार यांच्यासह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आ.माने यांनी स्पष्टपणे सांगितले की, “पाणी म्हणजे जीवन आहे. जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. यासाठी गावपातळीवरील अडचणी, प्रशासनातील अडथळे आणि ठेकेदारांच्या समस्या दूर करून कामे मार्गी लावणे आवश्यक आहे. बैठकीत निलेवाडी, भेंडवडे, चावरे, चोकाक, जंगमवाडी, खोची, कुंभोज, माले, मुडशिंगी, पाडळी, प.कोडोली, रुकडी, शिरोली, भादोले, हेर्ले, इंगळी, माणगाव, मनपाडळे, नागाव, नवेपारगाव, नेज, जुने पारगाव, रांगोळी, रुई, संभापूर, तळंदगे, तळसंदे, टोप आदी गावांतील जलजीवन योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत गावपातळीवरील अडचणी, निधी वितरण, ठेकेदारांच्या समस्या यावर सविस्तर चर्चा झाली. उपस्थित प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. माणगावचे सरपंच राजू मगदूम यांनी बैठकीच्या आयोजनाबद्दल आमदार माने यांचे आभार मानले. आमदार माने यांनी सांगितले की, सर्व संबंधित घटकांनी समन्वय ठेवून जनहितासाठी ही कामे वेळेत पूर्ण करावीत. कोणतीही अडचण असल्यास ती तत्काळ निदर्शनास आणावी, मी स्वतः शासनदरबारी पाठपुरावा करीन असे सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post