इचलकरंजीत लिंगायत समाजाच्या विकासासाठी ‘वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळ’ स्थापन

इचलकरंजीत लिंगायत समाजाच्या विकासासाठी ‘वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळ’ स्थापन

इचलकरंजी लिंगायत समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ‘वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळ’ स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला. समाजाच्या विकासासाठी शासनदरबारी प्रभावी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, लवकरच लिंगायत समाजाचा व्यापक मेळावा आयोजित करून समाजाच्या प्रगतीसाठी ठोस दिशा ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही बैठक जिजामाता मार्केट, गायत्री भवनजवळ येथे पार पडली. अशोकराव स्वामी (आण्णा) यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या चर्चासत्रात लिंगायत समाजाच्या हितासाठी विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश पाटील, अ‍ॅड.विजय हावळे, बाळासाहेब पाटील यांनीही आपले विचार मांडले.बैठकीत जगत ज्योती बसवेश्वरांचा पुतळा बसवणे, लिंगायत समाज रुद्रभूमीचे नूतनीकरण, शिक्षण आणि मंदिरे विकास, लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता, अल्पसंख्याक दर्जाची मागणी, OBC दाखल्यांसाठी शासनदरबारी प्रयत्न, युवकांसाठी नोकरी व व्यवसायासाठी सवलती मिळवणे यासारख्या विषयांवर ठोस निर्णय घेण्यात आले. अशोकराव स्वामी यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, ही संघटना कोणत्याही व्यक्ती किंवा गटाच्या विरोधात नसून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करेल. समाजातील ४० हून अधिक जाती आणि ३५० हून अधिक पोटजातींमुळे समाज विखुरला गेला असून, त्याचा फटका शैक्षणिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला बसला आहे. त्यामुळे समाजबांधवांनी नव्या संघटनेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले. बैठकीला भारत मुरदुंडे, सुनील तोडकर, डॉ. चंद्रकांत लिगाडे, सदा मलाबादे, सुप्रिया मजले, गीता कुरुंदवाडे, सुरेंद्र माळी, रमेश तनवीरे, कलगोंडा पाटील, संजय नागुरे, चिदानंद कोडगी, बाळगोंडा पाटील यांच्यासह लिंगायत समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post