राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी इचलकरंजीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा
279-इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवार 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता श्रीमंत ना.बा.घोरपडे नाट्यगृह चौकात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा महायुतीच्या विजयाची नांदी ठरावी अशी न भूतो न भविष्यती होण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन आमदार प्रकाश आवाडे आणि भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी केले. यावेळी महायुतीतील सर्वच मान्यवरांची उपस्थिती असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शुक्रवार 8 नोव्हेंबर रोजी इचलकरंजीत येत आहेत. महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारासाठी घोरपडे नाट्यगृह चौक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेच्या नियोजनासाठी भाजपा शहर कार्यालयात बैठक झाली. प्रारंभी शहर अध्यक्ष पै.अमृत भोसले यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करत सर्वांनी एकजुटीने सभा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.आमदार प्रकाश आवाडे यांनी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची इचलकरंजीत प्रथमच सभा होत असून ही सभा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या विजयाची संकल्प सभा ठरावी. पश्चिम महाराष्ट्रातील विराट अशी ही सभा होऊन सभेच्या माध्यमातून युवकांमध्ये नवा जोश निर्माण होऊन त्याचे रुपांतर निश्चितपणे महायुतीच्या विजयात होईल. राज्यात महायुतीला चांगले दिवस असून राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार आहे. त्यामुळे सर्वांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटीवर भर देऊन मताची टक्केवारी कशी वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. लोकसभा निवडणूकीपेक्षाही विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात इचलकरंजीतील विराट सभेच्या माध्यमातून भाजपाच का याचे उत्तर सर्वांना मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून एकजुटीने ही सभा यशस्वी करुया. त्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सभेसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन केले. याप्रसंगी मिश्रीलाल जाजू, धोंडीराम जावळे, तानाजी पोवार, स्वप्निल आवाडे, उदय बुगड, दिलीप मुथा, जयेश बुगड, अनिल डाळ्या, बाबासाहेब चौगुले, प्रसाद खोबरे, मनोज साळुंखे, मनोज हिंगमिरे, अश्विनी कुबडगे, शहाजी भोसले, राजेश रजपुते, प्रसाद खोबरे आदींसह शहर व ग्रामीण भागातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.