No title

गत हंगाम सन २०२२ -२३ मधील तुटलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता द्या ; खासदार शेट्टी यांची राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती.सुजाता सौनिक यांच्याकडे मागणी 


गत हंगाम सन २०२२ -२३ मधील तुटलेल्या ऊसाला ३ हजार पेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी १०० रूपये व ३ हजारापेक्षा जादा दर दिलेल्या कारखान्यांनी ५० रूपये दुसरा हप्ता देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने मान्य करून राष्ट्रीय महामार्गावरील रास्ता रोको थांबविण्यात आला होता. सहा महिने झाले कारखान्यांनी प्रस्ताव ऊस दर नियंत्रण समितीकडे सादर केला आहे. मात्र मुख्यमंत्री यांच्या दबावामुळे मुख्य सचिव यांनी बैठक लांबवून ऊस उत्पादक शेतक-यांचे नुकसान करत आहेत. यामुळे सदरची बैठक तातडीने घेऊन या कारखान्यांना दुसरा हप्ता देण्यास मान्यता देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मंत्रालयात राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती. सुजाता सौनिक यांच्याकडे भेट घेऊन केली. यावेळी बैठकीत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की सरकारच्या  मध्यस्थीने आंदोलन स्थगित केले होते. दोन महिन्याच्या आत ऊस उत्पादकांचे पैसे खात्यावर वर्ग करण्याबाबत मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी कबूल केले होते. सरकारने कारखान्यांना कोणतेही अर्थसहाय्य न करता कारखान्यांकडे नफ्यातील शिल्लक राहिलेले पैसे शेतक-यांनी मागितले आहेत. मात्र सरकार ऊस उत्पादक शेतक-यांचा बळी घेण्यासाठी कारखानदारांची पाठराखण करून प्रस्तावास मान्यता देण्यास टाळाटाळ करत आहेत. येत्या १५ दिवसात याबाबत निर्णय न झाल्यास शासनाला ऊग्र आंदोलनास सामोरे जावे लागेल असा इशारा मुख्य सचिव श्रीमती. सौनिक यांना दिला. त्याबरोबरच रत्नागिरी- नागपूर महामार्गामधील अंकली ते चोकाक या अस्तित्वात असलेल्या पुर्वीच्या मार्गावरील भुसंपादनास चौपट मोबदला देवून भुसंपादन करण्याचा प्रस्ताव मागवून घेऊन भुसंपादन करण्यास मंत्रिमडळाच्या बैठकीत मान्यता देण्याची मागणी केली. यावेळी मुख्य सचिव श्रीमती. सुजाता सौनिक यांनी तातडीने ऊस दर नियंत्रण समितीची बैठक लावून  निर्णय  घेऊ तसेच रत्नागिरी - नागपूर महामार्गाच्या प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याबाबत संबधित विभागास निर्देशीत केले.

Post a Comment

Previous Post Next Post