प्रीपेड मीटर व मनुःस्मृतीच्या विरोधात आंदोलनाचा इंडिया आघाडीचा इशारा
इचलकरंजी येथे इंडिया आघाडी इचलकरंजी यांच्या वतीने प्रांत कार्यालय व महावितरण कार्यालय येथे शिष्टमंडळासह भेट घेऊन मनुस्मृती विरोधात आणि प्रीपेड मीटर विरोधात याप्रमाणे दोन निवेदने देण्यात आली आहेत. निवेदनाच्या प्रती सोबत जोडलेल्या आहेत. प्रांत कार्यालयामध्ये शिरस्तेदार श्री संजय काटकर व महावितरण कार्यालयामध्ये कार्यकारी अभियंता श्री प्रशांत राठी यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी प्रांतकार्यालयामध्ये मनुस्मृती विरोधात बोलताना श्री शशांक बावचकर यांनी राज्य शासनाने मनुस्मृती व तत्सम धार्मिक बाबींचा शालेय अभ्यासक्रमात अंतर्भाव केल्यास त्या विरोधात सर्व मतदार संघात सर्वत्र चौका चौकात मनुस्मृतीचे दहन केले जाईल आणि त्याचबरोबर मनुस्मृती विरोधात प्रखर रस्त्यावरील आंदोलन उभे केले जाईल असा इशारा दिला आहे. प्रांतकार्यालय व महावितरण कार्यालय येथे बोलताना प्रताप होगाडे यांनी प्रीपेड मीटर विरोधातील मागण्या स्पष्ट केल्या आहेत. 4000 रुपये किमतीचे मीटर 12000 रुपयाला खरेदी करण्यात आले आहेत. यामागील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात आली पाहिजे. त्याचबरोबर राज्यातील सर्वसामान्य घरगुती, छोटे व्यावसायिक व छोटे औद्योगिक ग्राहक यांना या मीटरची कोणतीही गरज नाही. त्यामुळे 300 युनिटच्या आत वीज वापर करणाऱ्या सर्वसामान्य वीज ग्राहकांचे सध्याचे पोस्टपेड मीटर आहे तेच ठेवण्यात यावे. 12000 रुपयांच्या मीटरचा कोणताही भुर्दंड सर्वसामान्य ग्राहकावर लादला जाता कामा नये. अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रीपेड मीटर्सच्या विरोधातील कृती कार्यक्रम इंडिया आघाडीच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रथम राज्यात सर्वत्र सरकारला व महावितरण ला जाहीर इशारा व सूचना म्हणून निवेदने दिली जातील. त्यानंतर दुसरा टप्पा येत्या महिन्याभरात राज्यात सर्वत्र महावितरण कार्यालय समोर मोर्चे व आंदोलने करण्यात येतील. त्याचबरोबर तिसरा टप्पा म्हणून आजपासूनच राज्यात सर्वत्र वैयक्तिक वीजग्राहकांचे लेखी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. राज्यात सर्वत्र प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य वीज ग्राहकांचे अर्ज हजारोच्या संख्येने स्थानिक विभागीय कार्यालयामध्ये दाखल केले जातील. मीटर कोणते असावे याचे सर्व कायदेशीर अधिकार संबंधित वीज ग्राहकाला आहेत. त्यामुळे कोणत्याही वीजग्राहकावर प्रीपेड मीटरची सक्ती करता येणार नाही. अशी सक्ती कोठेही झाल्यास त्या सक्तीच्या विरोधात त्वरित प्रखर आणि रस्त्यावरील आंदोलन करण्यात येईल असाही इशारा याप्रसंगी आघाडीच्या वतीने देण्यात आलेला आहे. इंडिया आघाडीच्या या शिष्ठमंडळामध्ये शशांक बावचकर (प्रदेश सरचिटणीस, इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र) मदन कारंडे (प्रांतिक सदस्य, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार, महाराष्ट्र) सागर चाळके (मँचेस्टर आघाडी) सयाजी चव्हाण (शहर प्रमुख, शिवसेना उबाठा) प्रताप होगाडे (प्रदेश कार्याध्यक्ष, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र) कॉ. भरमा कांबळे (मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी) कॉ. सुनिल बारवाडे (लाल निशाण पक्ष) प्रकाश सुतार (आम आदमी पार्टी), कॉ. हणमंत लोहार (भारतीय कम्युनिस्ट पार्टी), भाई शिवाजी साळुंखे (शेतकरी कामगार पक्ष) जाविद मोमीन (समाजवादी पार्टी) संजय कांबळे (इंडियन नॅशनल काँग्रेस) राहुल खंजीरे (इंडियन नॅशनल काँग्रेस) प्रकाश मोरबाळे (मँचेस्टर आघाडी) सुहास जांभळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शप) कॉ.सदा मलाबादे (मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी) श्रीमती उषा कांबळे, प्रदीप कांबळे (रिपाई) श्रीमती नंदा साळुंखे (रिक्षा संघटना), ज्योत्स्ना भिसे, बाबासाहेब कोतवाल व अन्य एकूण 50 प्रतिनिधी उपस्थित होते.