काळम्मावाडी धरणातून इचलकरंजी-कोरोची येथील युवक गेला वाहून
राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी येथे धरण पाहण्यासाठी आलेला इचलकरंजी येथील युवक उज्वल कमलेश गिरी (वय २१, इचलकरंजी) हा सेल्फी घेत असताना पाय घसरून वाहून गेला आहे. घटनास्थळी राधानगरी पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते. याबाबत अधिक माहिती अशी की, इचलकरंजीजवळ असणाऱ्या कोरोची गावातील युवक उज्वल कमलेश गिरी (वय २१,मूळ गाव-बिहार) हा आपल्या मित्रांसमवेत काळम्मावाडी धरण पाहण्यासाठी आला असताना पाण्यामध्ये जाऊन सेल्फी घेत असताना पाय घसरून पडून वाहून गेला. तो मयत झाला असल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. तो अद्याप सापडला नसून त्याला शोधण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले होते. त्याचा अद्याप शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली. उज्वल सोबत असलेले मित्र हे डीकेटीई कॉलेज, इचलकरंजी येथील असल्याचे समजते.