कृष्णा योजनेची वितरण नलिका तातडीने बदलणार मक्तेदार राजेश राजगुरु यांची ग्वाही
कृष्णा पाणी पुरवठा योजनेची गळती बाधीत मजरेवाडी ते शिरढोण पर्यंतची २७०० मिटर नलिका तातडीने बदलण्याचे काम सुरू करण्याची ग्वाही इलिकॉन एनर्जी सोल्युशन प्रा.लि.मुंबई या कंपनीचे संचालक राजेश राजगुरु यांनी दिली. तर झालेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी ६ मार्चला पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा पाणी पुरवठा योजनेच्या ५५०० मीटर वितरण नलिका टाकण्याच्या कामकाजासंदर्भात गेल्या आठवडचात महाविकास आघाडीच्यावतीने उपायुक्त तैमुर मुलाणी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यावेळी उपायुक्त मुलाणी यांनी या संदर्भात संबंधित कामाच्या मक्तेदारासमवेत बैठक घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार सदर कामाचे मक्तेदार राजेश राजगुरु यांच्यासमवेत उपायुक्त मुलाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या प्रमुखांची बैठक झाली. बैठकीमध्ये संबंधित मक्तेदाराला सद्याच्या कामाची काय वस्तुस्थिती आहे, कामाची मुदत ९ महिने असताना ७ महिन्यात केवळ ३०० मिटर पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने वेळेत काम पूर्ण होणार काय?, कामात विलंब का लागत आहे? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर मक्तेदार राजगुरु यांनी विविध खात्याच्या परवानगी, पाईप येण्यास लागणारा विलंब यामुळे कामास विलंब होत असल्याचे स्पष्ट करून लवकरच ७०० मिटरपर्यंतची पाईपलाईन उपलब्ध होणार असून तात्काळ काम सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.
तर उपायुक्त मुलाणी यांनी झालेल्या कामाचा अहवाल देण्याच्या तसेच काम मुदतीत पुर्ण न झाल्यास दंड सुनावण्यात येईल, असे स्पष्ट केले. बैठकीस महाविकास आघाडीचे शशांक बावचकर, मदन कारंडे, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, नितीन जांभळे, संजय तेलनाडे, उदयसिंग पाटील, सदा मलाबादे, ताराराणी पक्षाचे सुनील पाटील, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, जलअभियंता सुभाष देशपांडे, बाजीराव कांबळे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.