कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचा ‘उत्कृष्ट जिल्हा’ पुरस्काराने सन्मान
सोलापुर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठकीत महाराष्ट्र राज्यस्तरावर उत्कृष्ट समाजसेवेचे कार्य करणार्या कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेला उत्कृष्ट कार्य जिल्हा पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत व सचिव लालचंद गट्टाणी यांनी स्वीकारला. सोलापूर येथे महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठक पार पडली. दोन दिवस संपन्न कार्यक्रमात राज्यातील 23 जिल्ह्यातील 550 प्रतिनिधी सहभागी झाले होते. महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मधुसूदन गांधी आणि प्रदेश मंत्री सत्यनारायण सारड़ा यांच्या हस्ते सभेचे उद्घाटन करण्यात आले. या पहिल्या सत्रात महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या घटना दुरुस्तीतील बदल सभागृहासमोर मांडण्यात आले. दुसर्या सत्रात प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी यांनी, सामाजिक योजनांची माहिती देत आम्हाला पद नाही जबाबदारी मिळाली आहे, त्यामुळे कोणीही पदाचा अभिमान बाळगून काम करू नये असे आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये जयसिगपूर येथील रमाकांत मालू (समृद्धी ग्रुप) यांना उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर वैद्यकीय क्षेत्रात सेवा करणारे इचलकरंजी येथील डॉ.वल्लभजी मर्दा यांना मानवता सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिसर्या सत्रात अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे अध्यक्ष संदीप काबरा यांनी संबोधित करताना, समाजातील प्रचलित सामाजिक समस्या कशा सोडवता येतील आणि समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचे जीवनमान कसे उंचावून त्यांना स्वावलंबी बनवता येईल याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य स्तरावर उत्कृष्ट समाज सेवेचे कार्य करणार्या कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेला ‘उत्कृष्ट कार्य जिल्हा’ पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत व सचिव लालचंद गट्टाणी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष चंदनमल मंत्री, शांतीकिशोर मंत्री, श्रीकांत मंत्री, भिकुलाल मर्दा, मुकेश खाबानी, विनीत तोष्णीवाल आदिंसह सर्व सदस्य उपस्थित होते. शेवटी सभेच्या अध्यक्षांनी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या घटना दुरुस्तीला मान्यता दिल्याची घोषणा केली.