पंतप्रधान मोदींची भेट घेणाऱ्यांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य; कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय
देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा धोका वाढत असल्याने केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी येणाऱ्या सर्व मंत्र्यांना आणि इतर व्यक्तींना आता आरटी-पीसीआर चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान यांच्यासोबतच्या बैठकीसाठी येणाऱ्यांनी पूर्वीच कोरोना चाचणी करून तिचा अहवाल सादर करणे आवश्यक असेल. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि पंतप्रधानांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोव्हिड-१९ चे ३०६ नवीन रुग्ण आढळले आहेत, तसेच सहा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ७,००० च्या पुढे गेली असून, संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने केंद्र सरकारने दक्षता घेतली आहे. हा निर्णय फक्त मंत्र्यांपुरता मर्यादित नसून पंतप्रधानांच्या संपर्कात येणाऱ्या इतर अधिकाऱ्यांनाही लागू होणार आहे. त्यामुळे संसदेतील बैठकींपासून ते इतर सरकारी कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींनाही ही चाचणी करूनच सहभागी होता येणार आहे.