श्री लक्ष्मी विद्यालय, ज्युनिअर कॉलेज, हसूर खुर्द येथे आजी-माजी विद्यार्थी शिक्षक स्नेह मिळावा तसेच चिकोत्रा धरण व पुनर्वसन चळवळीमधील सहकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कष्टकरी समाजाचे विचारवंत व लढाऊ नेते कॉम्रेड भारत पाटणकर होते. त्यांनी आपल्या मनोगतात गोरगरिबांच्या शाळा मोडण्याचे धोरण शासनाचे आहे. त्यामुळे त्या टिकवण्यासाठी समाजामधून उठाव होणे गरजेचे आहे नाहीतर पुढील काही वर्षात आपल्याला फी भरून शिक्षण घ्यावे लागेल आणि ते आपल्याला न परवडणारे असेल असे प्रतिपादन केले याप्रसंगी कॉम्रेड पाटणकर यांच्या हस्ते शाळेचे माजी शिक्षक पी.आय.नायकवडी व बी.एल.पाटोळे यांचा कॉम्रेड संतराम पाटील विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला. तसेच धरण व पुनर्वसन चळवळीतील 28 जणांचा कॉम्रेड संतराम पाटील पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा उभारणीच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावणारे कॉ.संतराम पाटील, कॉ.सुमित्राबाई संतराम पाटील व शाळेचे पहिले मुख्याध्यापक कै. आर.बी.पाटील सर यांच्या फोटोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉ.अतुल दिघे यांनी आपल्या मनोगतात
शाळेमधून बहु आयामी शिक्षण मिळणं गरजेचं आहे प्रत्येक जण आपल्या मुलाला व आपल्या विद्यार्थ्याला परीक्षार्थी बनवू पहात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळत नाही. शाळेने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे. शाळा ह्या चळवळीचे केंद्र बनली पाहिजेत आणि त्यातून नवे नेतृत्व उदयाला आले पाहिजे असे मत व्यक्त केले. माजी विद्यार्थी राम जाधव यांनी या कार्यक्रमाचे औचित्य साधून या शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली. त्याचबरोबर मुलांना भविष्यवेधी शिक्षण देण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेला मदत केली पाहिजे असे आवाहन केले. शाहीर आझाद नायकवडी यांनी पोवाडा सादर केला. भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदरावदादा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.डी.पाटील यांनी, प्रास्ताविक टी.एस.गडकरी यांनी तर सूत्रसंचालन एस.आर.पाटील यांनी केले, एस.एस.मांगले यांनी आभार मानले.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील