चांदी उद्योगाला केंद्र सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना पात्र (PMEGP ) व राज्य सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती (CMEGP) व यासारख्या शासकीय योजनेतून होणाऱ्या पतपुरवठ्याच्या निकषात चालू अधिवेशनात आवश्यक ते बदल करून घेण्याचे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाऊंडेशन च्या शिष्टमंडळाला दिले.
हुपरी परिसरातील दहा-बारा गावात चांदीचे दागिणे बनविण्याचा हस्तकला उद्योग चालतो. या उद्योगाची वाढ व्हावी व त्यातून रोजगार निर्मिती होऊन अनेक बेरोजगाराच्या हाताला काम लागावे. या उदात्त हेतूने केंद्र सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना व राज्य सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून पात्र चांदी उद्योजकांना कमी व्याज दराने 50 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. त्या शिवाय 15 ते 35 टक्के अनुदान ही दिले जाते. पण दुर्दैवाची बाब म्हणजे हुपरी परिसरातील या उद्योगाला गेल्या पाच सहा वर्षात एकाही उद्योजकाला या योजनेतून एका ही बँकेने पतपुरवठा केलेला नाही. तसेच नवीन निकषानुसार चांदी उद्योगासह सर्वच उद्योगाना 15 टक्के खेळते भांडवल व 85 टक्के मशीनरीची अट घातली आहे. ही अट इतर उद्योगांना योग्य आहे. पण चांदी उद्योगासाठी ती अडचणीची आहे. कारण चांदी उद्योग हा हस्तकला उद्योग असल्यामुळे किरकोळ हत्यारे वगळता मोठया प्रमाणात मशीनरी लागत नाही. पण खेळते भांडवल म्हणून चांदीचा डाक, वेगवेगळ्या डिझाईन स्टॉक मध्ये ठेवाव्या लागतात आणि त्यासाठी मोठया प्रमाणात भांडवल गुंतवावे लागते. याबाबतची माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्योग निरीक्षकांनाही आहे. तेव्हा जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्योग निरीक्षकांचा अहवाल घेऊन, चांदी उद्योगाला विशेष बाब म्हणून विविध शासकीय योजनातून होणाऱ्या पतपुरवठ्याचा निकष मशीनरीसाठी-10 टक्के; तर खेळते भांडवल म्हणून कच्चा माल - 90 टक्के या निकषावर कर्ज उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून उद्योगाला भरभराटीचे दिवस येऊन रोजगार निर्मिती होईल व अनेकांच्या हाताला काम लागणेस मदत होईल. तसेच दरवर्षी हुपरी परिसरातील सर्व बँकाना चांदी उद्योगातील नवउद्योजक सुशिक्षित बेकारांना कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट द्यावे.अशी मागणी हुपरी चांदी उद्योग विकास फाऊंडेशन च्या संचालक मंडळाने एका निवेदणाद्वारे मागणी केली. यावेळी फाऊंडेशन चे अध्यक्ष मोहन मनोहर खोत तसेच संचालक चेतन देशपांडे, विलासराव जाधव, संदीप अडसूळे उपस्थित होते. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी वस्तुस्थिती समजावून घेऊन लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांची चालू अधिवेशनात भेट घेऊन चांदी उद्योगाबरोबर काजू प्रक्रिया उद्योगाला कर्ज पुरवठ्याचे नियम बदलून घेण्याचे आश्वासन दिले.