आजची पिढी सक्षम घडवा ; प.पूज्य.श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी,रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्यावतीने अध्यात्मिक प्रवचन सुरू
अपेक्षा आणि गरज यांचा ताळमेळ ठेवून आपली बुध्दी सशक्त ठेवायला हवी. पुढच्या पिढीचा जरूर विचारा करावा पण आजची सक्षम पिढी घडवा,असे मार्गदर्शन पूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केले.रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, श्री गुरुदेव आध्यात्मिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 'विदुर निती' या विषयावर तीन दिवसीय अध्यात्मिक प्रवचन सोहळा रोटरी क्लब दाते मळा येथे आयोजित करण्यात आले आहे.यावेळी काडसिद्धेश्वर स्वामीजी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. स्वागत रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी केले. प्रोजेक्ट चेअरमन संजय खोत यांनी प्रास्ताविक केले.प्रकाश गौड,वसंत पाटील, मनीष मुनोत,ऋषी मोहनका, विठ्ठलराव डाके, डी. एम. कस्तुरे, नेमिनाथ कोथळे, महेंद्र मुथा यांची प्रमुख उपस्थिती होती. विदुर निती या विषयावर पुढे बोलताना स्वामीजी म्हणाले," आज घडीला काही गोष्टी वाईट आहे हे माहीत असतानाही माणूस मात्र आचरण करत नाही.कोणी काय सांगावे, कोणाचे का ऐकावे याबाबत सदसदविवेक बुद्धी हवी. कोणाच्या उपदेशाने माणसाने भ्रमित न होता हे निश्चित ध्येयावर ठाम राहावे आणि इच्छा कार्य पूर्ण करूनच जगाला सांगावे. मनाच्या थैलीत सकारात्मक गुण भरून थैली मजबूत करण्याचे काम विदुरनिती करते. ही नीती ऐकून माणसामधील संशय नष्ट होतो, उदारतेचा विस्तार तर मनोबल त्रिगुणीत वाढते.हे संग्रह ठेवणे माणूस म्हणून आपले कर्तव्य आहे."स्वामीजींनी उपस्थितांना महात्मा विदुरांच्या नितीशास्त्राची ओळख करून दिली.विदुरांचे नीतिशास्त्र हे महाभारतातील एक महत्त्वाचे प्रकरण असून ते आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन करत स्वामीजींनी श्रोत्यांना विदुर नितीचा अभ्यास करून त्यानुसार आचरण करण्याचे आवाहन केले. विदुरांनी सांगितलेल्या नितीचा आजच्या जीवनात कसा उपयोग करून घेता येतो, याचे विवेचन त्यांनी सखोलपणे केले. स्वामीजींनी आपल्या भाषणात महात्मा विदुरांनी मांडलेल्या नैतिकतेच्या व व्यवहारज्ञानाच्या सिद्धांतांचाही उल्लेख केला. विदुर नितीतील विचार हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला योग्य दिशा देणारे असून, त्यात नीतिमूल्ये, कर्तव्य, न्याय व धर्म यांची सांगड घालण्यात आली आहे, असे सांगितले. प्रवचन सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक व श्रोते उपस्थित होते. हे प्रवचन बुधवार दिनांक 18 डिसेंबर पर्यंत चालणार आहे.