पंचगंगा नदी प्रदुषणाचा प्रश्न प्रदीर्घकाळापासून एैरणीवर आहे. वस्त्रोद्योगाचे शहर असल्याने येथील विविध घटकातून सोडले जाणारे सांडपाणी नदीत मिसळते. असे असताना काही संघटनांकडून प्रदूषणाचे भांडवल करून कत्तलखाना बंद करण्याचा घाट घातला असून मागणी चुकीची व जनतेची दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे कत्तलखान बंद करण्यात येऊ नये अशी मागणी करतानाच कत्तलखाना बचाव आंदोलन सुरु करावे लागेल, असा इशारा कत्तलखाना बचाव कृती समिती व भागातील नागरिकांच्या वतीने प्रांताधिकारी यांच्याकडे दोन हजार हून अधिक नागरिकांच्या सह्या असलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. काही दिवसांपासून शहरातील कत्तलखाना प्रश्नावरुन आंदोलन सुरु आहे. या कत्तलखान्यातून विनाप्रक्रिया सांडपाणी ओढ्याद्वारे नदीत सोडले जात असल्याचा आरोप केला जात आहे. तर इचलकरंजी अॅग्रो फुडस्कडून शासन व प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन केले जात असल्याचे सांगितले जात आहे. याच प्रश्नावरुन मंगळवारी भागातील नागरिक व बचाव कृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न अनेक दशकांपासून सुरु आहे. याबाबत शासन स्तरावर अनेक बैठका आणि निर्णय झाले. पंचगंगा नदी प्रदूषण केवळ इचलकरंजी नव्हे तर कोल्हापूरातून येणार्या सांडपाण्यामुळेही होते ही वस्तु:स्थिती आहे. पण कत्तलखान्यातील पाण्याचा विषय करून तो बंद करण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी चुकीची व जनतेची दिशाभूल करणारी आहे. तत्कालीन इचलकरंजी नगरपालिकेने इचलकरंजी अॅग्रो फुडस् या कंपनीस बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्वावर हा कत्तलखाना चालविण्यास दिला आहे. 20 वर्षापासून हा कत्तलखाना चांगल्या प्रकारे सुरु असून कोणतेही प्रदूषण होत नाही. प्रदूषण नियंत्रणाचे सगळे नियम पाळले जातात. त्यामुळे कत्तलखाना बंद करण्याची मागणी निराधार आणि बिनबुडाची आहे. प्रदूषणाचे काटेकोर नियम पाळून सुरु असणार्या कत्तलखान्यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. शिवाय शासनाला मोठ्या प्रमाणात विविध करांच्या माध्यमातून महसूल मिळतो. त्यामुळे कत्तलखाना बंद करू नये. तसे झाल्यास नाईलाजाने कत्तलखाना बचाव आंदोलन करावे लागेल, असे म्हटले आहे.यावेळी रुबन आवळे, मोहिन बेपारी, बाबासाहेब लाखे, मोदीन बेपारी, विकास सुवाशे, रजाक बेपारी, रंगराव हेगडे आदींसह भागातील नागरिक व कत्तलखाना बचाव कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.